पुलाच्या कामाला गती
मार्च २०२८ पर्यंत पूर्णत्वाचा शासनाचा निर्धार
उरण, ता. २२ (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य रसपुल्ते विकास महामंडळामार्फत उभारण्यात येत असलेल्या रेवस-करंजा खाडी पुलाच्या कामाला प्रत्यक्ष गती मिळाली असून, प्रकल्पाचे सुमारे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई आणि कोकणाला थेट जोडणारा हा महत्त्वाकांक्षी दुवा येत्या डिसेंबर २०२६ पर्यंत ५० टक्के पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मार्च २०२८ पर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा शासनाचा निर्धार आहे.
रेवस ते रेड्डी सागरी महामार्गातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, करंजा-रेवस खाडीच्या मध्यभागी २.४ किलोमीटर लांबीचा मुख्य पूल उभारला जात आहे. याशिवाय दोन्ही बाजूंना प्रत्येकी चार किलोमीटर असे एकूण आठ किलोमीटर लांबीचे जोडरस्ते आणि पूल बांधले जाणार आहेत. सध्या खाडीत १२ ते १३ पिअर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे दोन हजार ४७८ कोटी रुपयांच्या खर्चातून हा प्रकल्प साकारत आहे.
या मार्गाची घोषणा १९८० मध्ये झाली होती; मात्र विविध कारणांमुळे प्रकल्प रखडला होता. आता प्रत्यक्ष काम सुरू झाल्याने कोकणातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या पुलामुळे जेएनपीए ते अलिबाग हे अंतर ५५ किलोमीटरवरून थेट ३० किलोमीटरपर्यंत कमी होणार असून, पेण-पनवेलचा लांबचा फेरा टळणार आहे.
दरम्यान, करंजा येथील चाणजे महसूल हद्दीतील जमीन संपादनाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशी रस्ता नेल्यास उत्खननामुळे पर्यावरण व ऐतिहासिक डोंगराला धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मार्गाचा पुनर्विचार करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अंतरात मोठी बचत
रेवस-करंजा खाडी पूल पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते अलिबाग प्रवासासाठी लागणारे अंतर व वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, कोकणातील पर्यटन, उद्योग आणि दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे.