१५ डब्यांची लोकल दृष्टिपथात
ठाणे स्थानकात पायाभूत बदल; पुनर्बांधणीचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : पावसाळ्यापूर्वी १५ डब्यांची लोकल सुरू करण्याच्या दृष्टीने मध्य रेल्वेने वेगाने पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे स्थानकावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या वाढविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. रविवारी घेण्यात आलेला मेगाब्लॉक यशस्वीरीत्या पूर्ण झाला. या कालावधीत ठाणे येथील फलाट विस्तार तसेच १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी यार्डची पुनर्बांधणी करण्यात आली.
ठाणे स्थानक हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. दररोज सात लाखांहून अधिक प्रवासी येथे प्रवास करतात. फलाट क्रमांक दोनवरून कल्याण दिशेने लोकल कर्जत, कसाऱ्यापर्यंत धावतात. तर फलाट क्रमांक चारवर या मार्गावरून येणाऱ्या लोकल छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापर्यंत पोहोचतात. फलाट क्रमांक तीनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कसारा, कर्जतपर्यंत लोकल सुटतात.
या तिन्ही फलाटांवर सकाळ-संध्याकाळच्या पीक अवरमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. स्थाकातील जलद मार्गावरील फलाटांची लांबी व उंची याआधीच वाढवण्यात आल्याने येथे १५ डब्यांच्या लोकल थांबतात. पण फलाट क्रमाक २, ३ आणि ४ वर १५ डब्यांची लोकल दोन वेळा थांबवण्याची वेळ ओढवते. त्यामुळे या फलाटांची लांबी वाढवण्याचे काम रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच हाती घेतले आहे. १५ डब्यांची लोकल थांबवण्याच्या दृष्टीने यांत्रिकी कामाचा महत्त्वाचा टप्पा मध्य रेल्वेने सुरू केला आहे. रविवारी घेतलेल्या ब्लॉकदरम्यान अभियांत्रिकी, ओव्हरहेड वायर (ओएचई), सिग्नल व दूरसंचार विभाग यांनी समन्वयाने काम केले. क्रेनच्या सहाय्याने स्विचेस व कल्व्हर्ट काढणे-बसवणे, सायडिंगचे काम, टॅम्पिंग, नवीन क्रॉसओव्हर टाकणे, ट्रॅक शिफ्टिंग तसेच सुमारे ८० मीटर नवीन ट्रॅक टाकण्याची कामे पार पडली. यासोबतच संपर्क तारा पुन्हा ताणणे, ओएचई देखभाल, पॉइंट मशीन व सिग्नल यंत्रणेचे स्थलांतर आणि ट्रॅक सर्किट शिफ्टिंग अशी महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली.
१५ डब्यांच्या सेवांसाठी महत्त्वाचा टप्पा
मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलची संख्या वाढविण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ३४ यार्ड रिमॉडलिंग कामांपैकी ठाणे येथील काम महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. यार्डमधील सुधारित सुविधांमुळे १५ डब्यांच्या गाड्यांचे स्टॅबलिंग व देखभाल सुलभ होणार असून, गर्दीच्या तासांत अतिरिक्त सेवा चालविणे शक्य होणार आहे.
प्रवासी ताण कमी होण्याची अपेक्षा
ठाणे स्थानक हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. दररोज लाखो प्रवासी या स्थानकाचा वापर करतात. १५ डब्यांच्या सेवांमध्ये वाढ झाल्यास गर्दी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून मेगाब्लॉक पार पडल्याचे प्रशासनाने नमूद केले. सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम रेल्वे सेवा देण्याच्या वचनबद्धतेनुसार पायाभूत सुविधा मजबूत करण्याचे काम सुरूच राहणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
गर्दीचे विभाजन
फलाटांची रुंदी वाढवल्यामुळे लोकलमधील गर्दी विभागली जाणार आहे. प्रवाशांना बसायला जागा मिळण्याची शक्यता वाढेल.
उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा मिळेल.
गर्दी कमी झाल्याने अपघाताचे प्रमाण घटेल
प्रवास अधिक सुरक्षित बनेल.
सध्याची स्थिती
मध्य रेल्वेमार्फत सध्याच्या घडीला २० ते २२ फेऱ्या १५ डब्यांच्या चालवल्या जात आहेत.
यातील बहुतांश लोकल या जलद मार्गावर धावत आहेत.
धीम्या मार्गावर विशेषत: फलाट क्रमांक २ आणि ४ वर १५ डब्यांची जलद लोकल आल्यास तिला दोन वेळा थांबा द्यावा लागत आहे.
पावसाळ्याआधी काम फत्ते
मध्य रेल्वेच्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
ठाणे स्थानक हा त्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. तर त्यापुढील स्थानकांमध्येही १५ डब्यांच्या लोकल थांबतील अशी व्यवस्था उभी केली जात आहे. त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.