ठाण्यात नवी मुंबईचा वचपा
समित्यांपासून भाजपला दूर ठेवण्याची खेळी; शिंदे गटाचे जशास तसे उत्तर
ठाणे, ता. २४ : ठाणे महापालिकेत महायुती म्हणून एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये आता अंतर्गत कुरघोडीचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. या वादाला नवी मुंबईतील राजकीय घडामोडींची धार मिळाली असून, नवी मुंबईत भाजपने शिवसेनेला दिलेल्या वागणुकीचा वचपा आता ठाण्यात काढण्याची पूर्ण तयारी शिंदे सेनेने केली आहे. तौलनिक संख्याबळाचा आधार घेत ठाण्यातील महत्त्वाच्या समित्यांपासून भाजपला पूर्णपणे दूर ठेवण्याचा पवित्रा शिवसेनेने घेतल्याने महायुतीमधील संघर्ष उघड झाला आहे.
वादाचे मूळ नवी मुंबई महापालिकेतील सत्तेच्या समीकरणात दडलेले आहे. नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ६५ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली, तर तिथे स्वतंत्र लढलेल्या शिंदे सेनेला ४२ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने तिथे बहुमताच्या जोरावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३१-अ (२)चा आधार घेत परिवहन समितीत शिवसेनेला एकही जागा न देता स्वबळावर सर्व १२ सदस्य निवडून आणले. शिवसेनेला (शिंदे गट) तिथे मिळालेल्या या अपमानास्पद वागणुकीचे पडसाद आता ठाण्यात उमटू लागले आहेत.
ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचे ७५ आणि एका अपक्षासह एकूण ७६ नगरसेवकांचे संख्याबळ आहे, जे स्पष्ट बहुमतासाठी पुरेसे आहे. दुसरीकडे भाजपचे २८ नगरसेवक आहेत. नवी मुंबईत भाजपने जो नियम लावला तोच नियम ठाण्यात लावल्यास स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण समिती आणि वृक्ष प्राधिकरण यासारख्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये भाजपचा एकही सदस्य निवडून येऊ शकणार नाही. या तांत्रिक बाबीचा वापर करून भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्याची रणनीती शिवसेनेने आखली आहे.
महासभेतील नाट्य आणि खडाजंगी
सोमवारी झालेल्या ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेत या संघर्षाची पहिली ठिणगी पडली. आम्ही सत्तेत असलो तरी चौकीदाराच्या भूमिकेत राहू, असे म्हणत भाजपने प्रशासकीय कामांवरून गोंधळ घातला. यावर शिवसेनेचे सचिव राम रेपाळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सूचक इशारा दिला. सत्तेत राहून जर चौकीदाराचीच भूमिका बजावायची असेल, तर सत्तेतील सहभागावर पुनर्विचार करावा लागेल. पाय ओढण्याचे काम थांबवून विकासासाठी हातात हात घालून काम करावे अन्यथा नवी मुंबईतील खेळाचे पडसाद ठाण्यात उमटण्यास वेळ लागणार नाही, असे रेपाळे यांनी ठणकावून सांगितले.
भाजपचा सत्तेत वाटा हाच हक्क
दुसरीकडे भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. नवी मुंबई आणि ठाण्याची परिस्थिती वेगळी आहे. ठाण्यात आम्ही एकत्र निवडणूक लढलो आहोत. त्यामुळे सत्तेत सन्मानजनक वाटा मिळणे हा आमचा हक्क आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारचा गोंधळ हा केवळ प्रशासकीय विषयांवरून होता. नवी मुंबईचा पॅटर्न ठाण्यात लागू होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
होळीनंतरच्या सभेवर लक्ष
महासभेत झालेला गोंधळ आणि समित्यांच्या निवडीचा विषय लांबणीवर पडल्याने आता सर्वांचे लक्ष होळीनंतर होणाऱ्या सभेवर लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील हा जुना राजकीय संघर्ष आता ठाणे महापालिकेच्या विकासकामांवर आणि समित्यांच्या निवडीवर काय परिणाम करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सध्यातरी जशास तसे उत्तर देण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.