उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे रस्त्यावर फुलली रसवंतीगृहे
कासा, ता. २८ (बातमीदार) : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे शहराच्या विविध रस्त्यांवर रसवंतीगृह पाहण्यास मिळत आहेत. ताज्या उसाच्या रसाची मागणी वाढल्याने रसविक्रेत्यांची कमाईही जोमात आहे.
उन्हाचा जोर वाढल्यानंतर अनेक रस्त्यांवर विविध फळांच्या रसाच्या गाड्या दिसू लागतात. त्यात उसाची रसवंतीगृहे मोठ्या प्रमाणात असतात. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही हा नजारा पाहण्यास मिळतो. गरीब कुटुंबातील असंख्य मंडळींची ही रसवंतीगृहे असून, त्यांच्यासाठी हे एकप्रकारे उदरनिर्वाहाचे माध्यम असते. बर्फ टाकलेला उसाचा रस हा १० ते १५ रुपये व बर्फाशिवाय हा ग्लास २० ते २५ रुपयापर्यंत मिळतो. तसेच मध्यम व मोठ्या ग्लासप्रमाणेही उसाचा रसाचे विविध दर असतात.
सध्या शासनाने गृह उद्योग किंवा बेरोजगारांना आर्थिक कर्ज देऊन रसवंतीगृहासाठी रस गाळण्याच्या मशीन उपलब्ध करून दिल्या आहेत. यातील काही मशीन इंधनावर तर काही मशीन या विद्युतप्रणालीवर चालणाऱ्या आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागात काही ठिकाणी उसाचा रस काढण्यासाठी लाकडी गुऱ्हाळांचादेखील वापर केला जातो. उन्हाळ्याच्या काळात उसाचा रसाला जास्त मागणी असल्याने अनेक गरजवंत या दिवसात उसाचा रस गाळण्याचे कार्य करताना दिसतात.
------------
ऊस मूळतःच अत्यंत गुणकारी व पौष्टिक असा आहे. चवीला गोड व कॅलरी कमी असलेल्या उसापासून आपल्या शरीराला अनेक मार्गाने फायदा होत असतो. एक आरोग्यदायी फळ म्हणून ओळख असलेल्या उसामुळे शरीर हिवाळ्यात उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्यास मदत होते. ऊस रसामुळे प्रतिकारशक्तीदेखील वाढते. उसामध्ये असलेली फायबरची उच्च पातळी कावीळ, अशक्तपणा आणि ॲसिडिटीची समस्या दूर करण्यास मदत करते. ऊस आपले शरीर थंड करण्यास जठराला आराम देण्याचे काम करते.
कोट
सध्या रोजगार नसल्याने कर्ज काढून हे लहान रस काढण्याचे मशीन विकत घेतल असून, त्यातून आम्ही हा व्यवसाय करीत आहोत. यातून मिळणाऱ्या पैशावर संसार चालवतो.
- रमण सोनी, रसवंती चालक.