उल्हासनगरात पर्यावरणपूरक होळीचा जागर
महापौर, आयुक्तांनी दिली ‘हरित शपथ’
उल्हासनगर, ता. २८ (बातमीदार) : शहरातील पर्यावरण प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने पुढाकार घेतला आहे. येत्या २ आणि ३ मार्च रोजी होणारी होळी व धूलिवंदन पर्यावरणपूरक वातावरणात साजरी व्हावी, या उद्देशाने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर विशेष जनजागृती कार्यक्रम आणि पूजन पार पडले.
राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या निर्देशानुसार, आयुक्त मनीषा आव्हाळे व अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापौर अश्विनी कमलेश निकम आणि उपमहापौर अमर लुंड यांच्या प्रमुख उपस्थितीत उपस्थित सर्वांनी ‘हरित शपथ’ घेऊन निसर्ग संवर्धनाचा संकल्प केला. या वेळी बोलताना महापौरांनी नागरिकांना सण साजरा करताना निसर्गाची हानी टाळण्याचे आवाहन केले.
प्रशासनातर्फे कोरडी होळी किंवा मर्यादित पाण्याचा वापर करून सण साजरा करावा, रासायनिक रंगांऐवजी पर्यावरणपूरक व नैसर्गिक रंगांना प्राधान्य द्यावे, होळीसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडू नयेत; पर्यावरणपूरक साहित्य वापरून प्रतिकात्मक होळी साजरी करावी अशा महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
वृक्षतोड थांबवा
पृथ्वीचे संतुलन पंचमहाभूतांवर अवलंबून आहे. सण साजरा करताना नकळत निसर्गाचे नुकसान होणार नाही, याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घ्यावी, असे आवाहन उल्हासनगर महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नियोजन उपायुक्त विशाखा मोटघरे व विभागप्रमुख विशाखा सावंत यांनी केले होते. या वेळी उपायुक्त डॉ. दिपाली चौगले, माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी, राजा बुलानी, छाया डांगळे, वृक्ष फाउंडेशनच्या ज्योती तायडे यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.