विठ्ठलवाडी एसटी आगाराची दुरवस्था
आमदार सुलभा गायकवाड यांचे निधीसाठी निवेदन
कल्याण, ता. १ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या विठ्ठलवाडी एसटी आगाराची सध्या भीषण अवस्था झाली असून, या आगाराच्या कायापालटासाठी आमदार सुलभा गायकवाड यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून विशेष निधीची तातडीने मागणी केली आहे. कल्याणचे मुख्य एसटी आगार सध्या बंद असल्याने सर्व बसगाड्यांचा भार विठ्ठलवाडी आगारावर येत आहे; मात्र अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याचे आमदारांनी पत्रात नमूद केले आहे.
पत्राद्वारे आमदार सुलभा गायकवाड यांनी गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. आगारात प्रवाशांसाठी स्वच्छ शौचालय, निवारा शेड, पिण्याचे शुद्ध पाणी आणि महिलांसाठी ‘हिरकणी कक्ष’ यांसारख्या प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत. डेपो परिसरातील रस्ते पूर्णपणे उखडले असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात चिखल तर इतर वेळी धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. आगाराची संरक्षक भिंत पडल्यामुळे परिसरात नशेखोर आणि चोरांचा वावर वाढला आहे. तसेच वाढलेल्या झाडेझुडपांमुळे साप आणि विंचवांचा धोका निर्माण झाला असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
आगारातील अनेक बस जुन्या आणि खिळखिळ्या झाल्या असून, त्या वारंवार रस्त्यात बंद पडत आहेत. त्यामुळे नवीन बसची तातडीने गरज असल्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर चालक-वाहकांसाठी असलेले विश्रांतिगृह मोडकळीस आले असून, खिडक्या तुटलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले आहे.
राष्ट्रीय कर्मचारी सेनेची मागणी
विठ्ठलवाडी एसटी आगारातील कर्मचारी तसेच प्रवाशांच्या सुखसुविधेसाठी आगारात विविध कामे होण्याची गरज आहे. या करिता राष्ट्रीय कर्मचारी सेनेनेही पाठपुरावा सुरू केला असून, त्यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे ५० लाखांच्या खासदार निधीची मागणी केली आहे. यासंदर्भात निवेदन दिले असल्याचे विभागीय अध्यक्ष योगेंद्र कदम म्हणाले.
प्रवाशांना सुरक्षित व सुखकर प्रवास मिळावा आणि कर्मचाऱ्यांना कामाचे उत्तम वातावरण मिळावे, यासाठी या आगाराचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.
- सुलभा गायकवाड (आमदार, कल्याण पूर्व)
विठ्ठलवाडी एसटी आगारप्रमुख म्हणून दोन महिन्यांपूर्वीची मी पदभार स्वीकारला आहे. गाड्यांचे ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण आता कमी झाले आहेत. शिवाय सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या नियमितपणे सुटत आहेत.
- राहुल कुंभार (एसटी आगार व्यवस्थापक, विठ्ठलवाडी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.