मोबाईलच्या अतिवापराचे होळीत दहन
सम्राट अशोक विद्यालयाचा अभिनव उपक्रम
डोंबिवली, ता. ३ : होळीच्या अग्नीत वाईट विचारांचे दहन करण्याची परंपरा आहे. कल्याणमधील सम्राट अशोक विद्यालयाने यंदा काळाची गरज ओळखून एका वेगळ्या प्रवृत्तीचे दहन केले. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर या आधुनिक व्यसनाची प्रतीकात्मक होळी पेटवून डिजिटल डिटॉक्स आणि व्यसनमुक्तीचा अनोखा संदेश दिला.
आजकाल शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलचे वेड प्रचंड वाढले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस कमी होऊन मैदानी खेळ आणि कौटुंबिक संवादावर गदा येत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन विद्यालयाने सामाजिक जाणीव जागृतीसाठी हा उपक्रम राबविला. होळीच्या ठिकाणी मोबाईलचा अतिरेकी वापर टाळा, असा विशेष फलक लावून जनजागृती करण्यात आली.
मालवणी गाऱ्हाणे
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी घातलेले गाऱ्हाणे. आमच्या लेकरांना लागलेला मोबाईलचा नाद काढून टाका आणि अभ्यासात रमू दे, अशा शब्दांत मालवणी भाषेत साकडे घालत विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. बालवर्गापासून ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात हिरिरीने सहभाग घेतला. अशाच प्रकारे डोंबिवलीतील विद्यानिकेतन विद्यालय (उंबार्ली) येथेही पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्यात आली. प्लॅस्टिकमुक्त सण आणि नैसर्गिक रंगांच्या वापराबाबत विद्यार्थ्यांनी परिसरात प्रबोधन केले. जलस्रोत प्रदूषित होऊ नयेत, यासाठी विद्यार्थ्यांनी नागरिकांना आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी घेतली डिजिटल संयमाची शपथ
मुख्याध्यापक गुलाबराव पाटील आणि मुख्याध्यापिका विजया तांबे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी एक महत्त्वपूर्ण शपथ घेतली. मी मोबाईलचा अतिरेकी वापर करणार नाही. अभ्यासाला प्रथम प्राधान्य देईन आणि पालक, शिक्षकांचा सन्मान राखून सुसंस्कृत नागरिक बनेन.