शहाड जलशुद्धीकरण केंद्राचा पाणीपुरवठा खंडित
उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : महावितरणच्या मोहने उपविभागातील तांत्रिक बिघाडामुळे एमआयडीसीच्या शहाड जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरुवारी (ता. १२) अचानक खंडित झाला. याचा थेट परिणाम उल्हासनगर शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेवर झाला असून, शहरातील कॅम्प १ ते ४ मधील अनेक भागांत पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.
महावितरणच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने शहाड केंद्रातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचा प्रवाह थांबला आहे. यामुळे शहरातील ‘जुनी’ आणि ‘नवीन’ पाणी साठवण टाकी (MBR) पूर्ण क्षमतेने भरता आलेली नाही. परिणामी, महापालिकेला नियोजित वेळेत पाणी सोडणे अशक्य झाले असून, नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्रभावी क्षेत्र
एमआयडीसीच्या तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या या पाणीकपातीचा सर्वात मोठा फटका उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक १ ते ३ मधील संपूर्ण भागाला बसला असून, कॅम्प क्रमांक ४ मधील काही ठराविक परिसरांमध्येही पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.
प्रशासनाचे आवाहन
महावितरणकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत संबंधित भागांत कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक ढोले यांनी केले आहे.