कल्याण-सीएसएमटी सर्व लोकल
१५ डब्यांच्या करा : डॉ. श्रीकांत शिंदे
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : मध्य रेल्वेवरील वाढती गर्दी आणि प्रवाशांवर पडणारा ताण लक्षात घेता कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) या मार्गावरील सर्व लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्यात याव्यात, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकसभेत केली. यासोबतच रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
डॉ. शिंदे यांनी सांगितले, की कल्याण लोकसभा मतदारसंघातील सुमारे ८० टक्के नागरिक दैनंदिन प्रवासासाठी लोकल रेल्वेवर अवलंबून आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, सुरक्षित आणि सुसह्य प्रवासासाठी १५ डब्यांच्या गाड्या सुरू करणे गरजेचे आहे. याशिवाय प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण, दिवा-सीएसएमटी जलद लोकल सेवा वाढवणे, कोपर-वसई रेल्वे फेऱ्या वाढवणे आणि कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पाला गती देण्याच्या मागण्या त्यांनी केल्या. कोकण मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकारांसाठी पूर्वीप्रमाणे सवलती पुन्हा सुरू कराव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
------
प्रलंबित प्रकल्पांकडे लक्ष वेधले
कल्याण मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले, की सध्या पाच ते सहा हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. ठाणे-कल्याण पाचवी आणि सहावी मार्गिका पूर्ण झाली असून, कल्याण-अंबरनाथ तिसरी व चौथी मार्गिका प्रगतिपथावर आहे. मात्र ठाणे ते सीएसएमटीदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका रखडली असून, ती लवकर पूर्ण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बुलेट ट्रेन, दिल्ली-मुंबई कॉरिडॉर तसेच मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद हायस्पीड प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचेल आणि राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.