आरटीई प्रवेशासाठी २५ मार्चपर्यंत मुदतवाढ
भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियमातील (आरटीई) तरतुदीनुसार ऑनलाइन प्रवेशासाठीची मुदत २५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी ऑनलाइन अर्ज भरावे, असे आवाहन मिरा-भाईंदर पालिकेने केले आहे.
दुर्बल व वंचित घटकांतील बालक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा लागू करण्यात आला आहे. त्याद्वारे स्वयंअर्थसहाय्यित शाळा, विनाअनुदानित शाळा या शाळांमध्ये या मुलांना ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेता येतो. कायद्यातील तरतुदीनुसार याआधी पालकांना परिसराच्या एक किमी अंतरापर्यंतची शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते; परंतु उच्च न्यायालयांच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलेल्या निरिक्षणानुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी एक किलोमीटर अंतरावर शाळा उपलब्ध नसेल तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही. त्या अनुषंगाने आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता पालकांना त्यांच्या निवासस्थानापासून अंतराची अट शिथिल करून शाळा दर्शविण्याबाबतची सुविधा संगणक प्रणालीवर देण्यात आलेली आहे.