पुन्हा रेल्वे प्रवाशांच्या पदरी निराशा
डहाणूला १५ डब्यांची गाडी नाहीच
पालघर, ता. १९ (बातमीदार) : पश्चिम रेल्वेच्या मार्गावर १९ मार्चपासून १२ डब्यांच्या १६ उपनगरी सेवा या १५ डब्यांमध्ये परावर्तित करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे प्रवासी संघटनांकडून वारंवार मागणी होत असतानाही यातील एकही गाडी डहाणू-चर्चगेट, डहाणू-बोरिवली व डहाणू-विरार या मार्गावर वाढवण्यात आली नाही. त्यामुळे एकप्रकारे डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या रेल्वे प्रवाशांबाबत पश्चिम रेल्वे भेदभाव करत असल्याचा आरोप डहाणू व इतर प्रवासी सेवाभावी संस्थेसह शिवसेनेचे प्रवक्ते केदार काळे यांनी केला आहे.
मागील अनेक वर्षांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी, रेल्वेसंदर्भात काम करणाऱ्या प्रवासी संघटना, पत्रकार व दैनंदिन रेल्वे प्रवासी हे गर्दीच्या वेळेला डहाणूपासून १५ डब्यांच्या लोकल सोडाव्यात, अशी मागणी करत आले आहेत. पण त्या मागणीकडे पश्चिम रेल्वेचे अधिकारी अक्षरशः दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी या वेळी केला आहे. स्थानिक खासदार डॉ. हेमंत सवरा हे नेहमीच रेल्वेमंत्र्यांना भेटत असतात. तसे असतानाही डहाणू ते वैतरणा या स्थानकदरम्यानच्या रेल्वे प्रवाशांचा विचार केव्हाच केला जात नाही, असेही प्रवासी संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.