डोंबिवलीत राष्ट्रभक्तीचा जागर
वंदे मातरमच्या जयघोषात नववर्ष स्वागतयात्रा उत्साहात
डोंबिवली, ता. १९ : वंदे मातरम गीताच्या १५०व्या वर्षाचे औचित्य साधून यंदाची डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रा राष्ट्रभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. श्री गणेश मंदिर संस्थानच्या पुढाकाराने आणि तरुणाईच्या खांद्यावर असलेल्या आयोजनाच्या जबाबदारीमुळे गुरुवारी शहरात चैतन्याचा महापूर ओसंडून वाहत होता.
पहाटे श्री गणेश मंदिरात विधिवत गणेशपूजन व पालखीपूजन करून यात्रेला सुरुवात झाली. डोंबिवली पश्चिमेतील कान्होजी जेधे मैदान येथून निघालेल्या या यात्रेत आबालवृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. विशेष म्हणजे, यंदा २० ते ३० वयोगटातील तरुणांनी या भव्य सोहळ्याचे नेटके नियोजन केले होते.
१५०व्या वंदे मातरम वर्षानिमित्त संपूर्ण यात्रेत देशभक्तीपर गीते आणि घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. शहरातील विविध क्षेत्रांतील १११ संस्थांनी आपापल्या चित्ररथांसह यात्रेत सहभाग नोंदवला. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परंपरेपासून ते पोलिस दलाच्या सामाजिक सुरक्षेच्या संदेशापर्यंत विविध विषय हाताळले होते. पर्यावरणासोबतच कल्याण लोकसभा मतदारसंघातील मेट्रो, डबल डेकर रस्ते आणि आधुनिक रुग्णालयांच्या प्रतिकृतींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमहापौर राहुल दामले यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले होते.
सामाजिक एकोपा आणि स्वागत
केवळ हिंदूबांधवच नव्हे, तर मुस्लिम समाजातील नागरिकांनीही यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करून सामाजिक एकतेचा संदेश दिला. मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यात्रेचा मार्ग
जेधे मैदान ते गोपी सिनेमा, सम्राट चौक, फडके रोडमार्गे मदन ठाकरे चौकात यात्रेची सांगता झाली. समारोपावेळी वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाला होता; मात्र महावितरणने तो तातडीने पूर्ववत करून सोहळ्यात खंड पडू दिला नाही.