वांद्री धरणातून पाण्याचा विसर्ग
नदीकाठच्या गावांना सावधगिरीच्या सूचना
मनोर, ता. २१ ः वांद्री धरणाच्या जॅकवेलमधील पाणी गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे वांद्री नदीत पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नदीकाठच्या गावांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाटबंधारे विभागाच्या वांद्री धरणाच्या मुख्य विमोचक विहिरीत पडझड झाल्यामुळे पाण्याची गळती सुरू झाली होती. विहिरीतील गळतीमुळे धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात होते. त्यामुळे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे धरणातील पाणी विमोचक दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.
----------------------------
दवंडीतून आवाहन
वांद्री नदीकाठच्या नागरिकांनी नदीत मासेमारी, पोहणे, अंघोळ तसेच कपडे धुण्यासाठी नदीत पात्रात जाऊ नये तसेच वांद्री नदी परीसरात सावधगिरीने वावरण्यासाठी सूचित केले आहे. तसेच ढेकाळे, जानसई, सातीवली, हालोली, दहिसर तर्फे मनोर, साखरे, नावझे, गिराळे, पारगाव ग्रामपंचायतींमध्ये दवंडी तसेच समाजमाध्यमातून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.