महालक्ष्मी- चारोटीदरम्यान धोका
कालव्याचा कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता
कासा, ता. २२ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर महालक्ष्मी ते चारोटीदरम्यानच्या कालव्याचा कठडा तुटलेल्या अवस्थेत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघाताचा धोका वाढल्याने तातडीने दुरुस्तीची गरज आहे.
महालक्ष्मी यात्रा अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार आहे. दुचाकी, रिक्षा तसेच इतर प्रवासी वाहने पर्यटकांना घेऊन मोठ्या संख्येने येत असतात; मात्र महालक्ष्मी ते चारोटीदरम्यान सेवा रस्ता अपूर्ण असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशातच महामार्गालगत असलेल्या कालव्यावरचा कठडा तुटल्यामुळे वाहनांसाठी धोकादायक आहे. अनेक वर्षांपासून महालक्ष्मी-चारोटीदरम्यानचा सेवा रस्ता अपूर्ण आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने कठडा दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
़़़़़़़़़ः--------------------------
महालक्ष्मी ते चारोटीदरम्यान सेवा रस्ता अपूर्ण आहे. दोन वर्षांपासून मागणी करत आहोत. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
- संतोष देशमुख, अध्यक्ष, महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट