हक्काच्या घरांसाठी सफाई कामगारांचा ‘वर्षा’वर मोर्चा
३६ वसाहती धोकादायक; पुनर्बांधणी रखडली
मुलुंड, ता. २१ (बातमीदार) : सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत, या प्रमुख मागणीसाठी २३ मार्च २०२६ रोजी मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ येथे मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली. २००८ मध्ये शासनाने घेतलेल्या निर्णयाची अपेक्षित अंमलबजावणी अद्याप न झाल्याने कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
काही निवडक कामगारांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या असल्या तरी बहुसंख्य कामगार अजूनही घरांपासून वंचित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. २०१३ मधील बाबू गेणू इमारत दुर्घटनेनंतर जुन्या वसाहतींच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र अनेक वसाहती आजही जीर्णावस्थेत असून, ४६ पैकी ३६ वसाहती धोकादायक स्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१५ मध्ये निधी मंजूर होऊनही, विशेषतः कोविड काळात कामे ठप्प झाल्याने प्रकल्प रखडले.
सध्या मुंबई महापालिकेचे हजारो सफाई कामगार मिरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण आणि पनवेल येथून दररोज प्रवास करून मुंबईत सेवा बजावत आहेत. कोविड काळात त्यांनी दिलेल्या योगदानानंतरही त्यांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
या प्रश्नावर विविध स्तरांवर चर्चा होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने संघटनेने यापूर्वी आंदोलने व उपोषणे केली होती. आता २३ मार्च रोजी ‘वर्षा’ येथे शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणावी आणि १४ एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी कामगारांना घरांच्या चाव्या द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विविध वसाहतींमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात असून, हजारो कामगार कुटुंबीयांसह मोर्चात सहभागी होणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.