‘राष्ट्रीय महामार्गाचे फेरसर्वेक्षण करा’
विक्रमगड (बातमीदार) ः पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे फेरसंरेखन तसेच पालघर सीमाभागातील रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणींचा समावेश आहे. मनोर, विक्रमगड बाजारपेठांमधून जाणाऱ्या एनएच १६० ए महामार्गाच्या प्रस्तावित रुंदीकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या आराखड्यानुसार महामार्ग दाट लोकवस्तीतून जाणार असल्याने घरे, दुकाने, तसेच सार्वजनिक व सामाजिक सुविधा बाधित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मार्गाचे फेरसर्वेक्षणाची मागणी सवरा यांनी केली आहे.