बुलेट ट्रेन प्रकल्पबाधितांना दिलासा
जैमुनी पतपेढीच्या ३९ लाखांच्या कर्जाची वसुली
विरार, ता. २८ (बातमीदार) ः बुलेट ट्रेन प्रकल्पबाधित जमिनींच्या मोबदल्यातून ‘जैमुनी’ पतपेढीच्या थकीत घोटाळा कर्जाची ३९ लाख १८ हजारांची वसुली करण्यात आली आहे. आमदार राजन नाईक यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे कायदेशीर लढ्याला यश आले आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पातून तारण मालमत्तेचा प्राधिकरणाकडून थेट मोबदला मिळवणारी जैमुनी ही एकमेव आर्थिक संस्था ठरली आहे. २५ मार्चला ही मोठी रक्कम संस्थेच्या खात्यात जमा झाली आहे. बोईसर पूर्वेकडील एका प्रकल्पातील काही मालमत्ता जैमुनी कर्ज घोटाळा प्रकरणात तारण होत्या. त्यापैकी चार कर्जे थकीत होती. पालघर येथील सक्षम प्राधिकरणाकडे संस्थेने आपल्या तारणी हक्काची रीतसर नोंद केली होती. डिसेंबर २०२२ मध्ये जमिनींच्या मोबदल्याचा निवाडा जाहीर होऊन विकसक, जमीनमालक, खरेदीदार यांना मोबदला मिळू लागला; मात्र संस्थेने सात वेळा मागणीपत्रे देऊनही तत्कालीन प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊनही प्रशासनाकडून कोणतीही दाद मिळाली नाही. त्यामुळे वसुलीचे काम पूर्णपणे रखडले होते. अखेर आमदार नाईक यांनी स्वतः लक्ष घालत पाठपुरावा केला होता.