दाेन काेटी वाहनांचा
‘अटल सेतू’वरून प्रवास
सव्वादोन वर्षांत चारचाकी वाहने सर्वाधिक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) उभारलेल्या अटल सेतूवरून प्रवास वेगवान झाला आहे. जवळपास २६ महिन्यांत शुक्रवारपर्यंत या मार्गावरून तब्बल दाेन कोटी ३१६ वाहनांनी ये-जा केली आहे. यात सर्वाधिक एक कोटी ८१ लाख चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
मुंबईतून नवी मुंबई, पनवेल, अलिबाग, पुण्याच्या दिशेने जाताना मुंबई उपनगरासह नवी मुंबईतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पाऊण तासांच्या प्रवासासाठी दोन-अडीच तास लागत हाेते. देशातील सर्वात लांब शिवडी- न्हावा- शेवादरम्यान उभारलेल्या सागरी सेतूमुळे हा वेळ खूप कमी झाला आहे. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे ‘एमएमआरडीए’ने स्पष्ट केले आहे. एक कोटी ८१ लाख ९५ हजार ७१८ खासगी चारचाकी वाहनांनी म्हणजे एकूण वाहनांच्या तुलनेत ९१ टक्क्यांपेक्षा अधिक वाहनांनी या पुलाचा वापर केला आहे. पाच लाख ९८ हजार ५२५ छाेटी व्यावसायिक वाहने, मिनीबस, बस आणि ट्रकची, तर १२ लाखांहून अधिक मध्यम, जड आणि अति-अवजड वाहनांच्या वाहतुकीची नोंद झाली आहे.