गझलनेच हात धरून आयुष्य घडवले!
पांचाळे यांचा सत्कार सोहळ्यात भावस्पर्शी सूर
ठाणे, ता. २९ (बातमीदार) ः ‘मेरी जिंदगी यूंही तमाम नहीं हुई… गझलने माझा हात धरला आणि मी तो घट्ट पकडून ठेवला,’ अशा शब्दांत गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी आपल्या आयुष्याचा प्रवास उलगडत रसिकांचे ऋण मान्य केले. गडकरी रंगायतन येथे आज त्यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात भावना व्यक्त करताना त्यांनी गझलप्रेम आणि मराठी गझलेच्या प्रवासावर भाष्य केले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या हस्ते गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा सत्कार गडकरी रंगायतन येथे करण्यात आला. या वेळी पत्नी गीता पांचाळे, गझलप्रेमी अशोक भगत, दत्ता बाळ सराफ, गझलकार म. भा. चव्हाण, गझलकार ज्योती बालिगिरीराव, माजी विभागीय आयुक्त दिलीप पांढरपट्टे, डॉ. अर्चना माळवी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी माने, तर आभारप्रदर्शन माळवी यांनी केले. सत्काराच्या सुरुवातीला आणि नंतर भीमराव आणि त्यांची कन्या डॉ. भाग्यश्री पांचाळे यांची ‘स्नेह गझल’ ही मराठी उर्दू गझलांची भावरम्य मैफल रंगली.
अमृतमहोत्सवी सोहळ्यात गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी आपल्या समृद्ध संगीत प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले, की लतादीदी यांच्या नावाचा पुरस्कार मिळण्यामागे कवी सुरेश भट यांचे मोठे योगदान आहे. भट यांनी गझल मराठीत रुजवली नसती, तर ती आपल्यापर्यंत पोहोचली नसती. त्यांच्या गझल प्रथम ऐकताना गझलेची सखोलता आणि सौंदर्य उमगले, असे त्यांनी नमूद केले. गझलमुळेच परदेशात जाण्याची संधी मिळाली, असेही पांचाळे म्हणाले. आम्ही गझल नाकारली, पण गझल हा कवितेचा प्रकार आहे, त्याचे लेकरू आहे. मराठीत गझल उशिरा येण्यामागे आपलीच मानसिकता कारणीभूत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पद्मश्री वाडकर यांनी भीमराव यांच्या गायकीचे मनापासून कौतुक केले. ते म्हणाले, की भीमराव हे स्वतःपेक्षा अधिक मोठे गायक आहेत. कारण त्यांनी संगीत क्षेत्रात अधिक सेवा दिली आहे. मराठी गझल गाणारा असा कलाकार मी क्वचितच पाहिला आहे. पांचाळे यांच्या रचना मला मोठ्या प्रमाणात मिळाल्या असून, त्या अतिशय गोड आणि अवघड होत्या. गायकीतील जागा घेणे ही ईश्वरदत्त देण आहे, असे त्यांनी नमूद केले आणि पांचाळेंना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
पांचाळे जसे पंच्याहत्तरीमध्ये गात आहेत तसेच ते शंभरीमध्ये गात राहावे. त्यांचे रसिक आजही त्यांचे चाहते आहेत. प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी भावना आहेत. त्यांच्यामध्ये नम्रता आहे, त्यांची राहणी साधी आहे, असे मंत्री सरनाईक यांनी या वेळी सांगितले.