ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांकडून न्याय
मालाड, ता. ३० (बातमीदार) : गोरेगाव लिंक रोड येथील एसआरए प्रकल्पातील आपले हक्काचे घर परत मिळवण्यासाठी वणवण भटकणाऱ्या एका ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बांगूरनगर पोलिसांनी तत्काळ दिलासा दिला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित कारवाई करीत संबंधित एजंटला बोलावून घर खाली करण्याचे आदेश दिले. यामुळे पीडित वृद्धाला मोठा आधार मिळाला आहे.
तक्रारदार हे अंदाजे ६५ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक असून, ते सध्या ठाणे येथे वास्तव्यास आहेत. लिंक रोडवरील देवी कन्याकुमारी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेत त्यांचे घर आहे. त्यांनी हे घर एका व्यक्तीला भाड्याने दिले होते. अशातच एजंटने मागील पाच ते सहा महिन्यांपासून भाडेच दिलेले नाही. इतकेच नव्हे तर, ज्येष्ठ नागरिकाला घर परत हवे असताना ते खाली करण्यासही एजंटने नकार दिला. अखेरीस त्या ज्येष्ठ नागरिकाने बांगूरनगर पोलिस ठाणे गाठले आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र आव्हाड यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. या घटनेचे गांभीर्य आणि तक्रारदाराचे वय लक्षात घेऊन आव्हाड यांनी तत्काळ दखल घेतली. पोलिसांनी त्वरित प्राथमिक तक्रार नोंदवून संबंधित एजंटला पोलिस ठाण्यात पाचारण केले. पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवताच एजंटने घर रिकामे करण्याचे मान्य केले. बांगूरनगर पोलिसांच्या या तत्पर भूमिकेमुळे न्याय मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकाने त्यांचे आभार मानले.