उल्हासनगरचा गांधी रोड धुळीच्या विळख्यात
इमारत तोडकामामुळे नागरिक हैराण; श्वसनाचा त्रास वाढला
उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : उल्हासनगर कॅम्प ५ मधील गजबजलेला गांधी रोड परिसर सध्या धुळीमुळे अक्षरशः गुदमरला आहे. येथील कुलदेवी मंदिर ते प्रभात गार्डनदरम्यान सुरू असलेल्या एका इमारतीच्या तोडकामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले असून, स्थानिक नागरिक, दुकानदार आणि पादचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या इमारतीचे तोडकाम सुरू आहे. मात्र हे काम करताना पर्यावरण आणि सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. धूळ उडू नये म्हणून नियमित पाण्याची फवारणी करणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात कोणतीही उपाययोजना केली जात नाही. तोडकामाचा राडारोडा आणि धूळ रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या संरक्षक जाळ्या किंवा पडदे लावण्यात आलेले नाहीत. इमारत तोडकाम करताना नियमित पाण्याची फवारणी आणि परिसराचे संरक्षण करणे अनिवार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
व्यापाऱ्यांना दुहेरी फटका
धुळीचा सर्वाधिक फटका रस्त्यावरील दुकानदारांना बसत आहे. उडणाऱ्या धुळीमुळे दुकानातील मालावर थरावर थर साचत असून, अनेक दुकानदारांना आपला माल वाचवण्यासाठी दुकाने कापडाने झाकून ठेवावी लागत आहेत. यामुळे व्यवसायावरही विपरीत परिणाम होत असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सततच्या धुळीमुळे परिसरात श्वास घेणे कठीण झाले असून, लहान मुले आणि ज्येष्ठांमध्ये श्वसनाचे विकार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.