हरित नवी मुंबईचा ध्यास
वाशी, ता. ३० (बातमीदार) ः नवी मुंबईला आता हरित आणि स्मार्ट बनवण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या वृक्ष प्राधिकरणाचा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी सोमवारी (ता. ३०) महापौर सुजाता पाटील यांच्याकडे सादर केला. शहरात सध्या १५ लाखांहून अधिक वृक्ष असून, आगामी वर्षात एक लाख नवीन वृक्षांच्या लागवडीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.
कोपरखैरणे येथे बोटॅनिकल गार्डन उभारण्यासाठी आठ कोटींची तरतूद केली आहे. प्रत्येक विभागात आधुनिक रोपवाटिका विकसित करण्यासाठी एक कोटी २५ लाख एवढी तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये व रस्त्यालगतच्या वृक्षांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत दुभाजकांमधील व रस्त्यालगतच्या वृक्षांची देखभाल, छाटणी, नवीन वृक्षारोपण, माती सुधारणा तसेच स्वयंचलित पाणीपुरवठा प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. यामुळे शहरातील हरितपट्टा अधिक बळकट होऊन हवेतील प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. यासाठी पालिकेकउून १३ कोटी ६० लाख इतकी तरतूद केलेली आहे. वृक्ष छाटणीसाठी विशेष वाहन खरेदीकरिता एक कोटी इतकी तरतूद केली आहे. याशिवाय हरित प्रभाग स्पर्धा, पर्यावरण जनजागृती उपक्रम, कार्यशाळा व कर्मचारी प्रशिक्षण याद्वारे नागरिक सहभाग वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. सीएसआरअंतर्गत कामांसाठी मानक कार्यप्रणाली म्हणजे एसओपी तयार करुन कामे अधिक नियोजनबद्ध करण्याचा मानस आहे. फ्लोटिंग गार्डन, रूफटॉप व व्हर्टिकल गार्डनसारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून प्रदूषण नियंत्रणाप्रमाणेच शहराचे सौंदर्य वृद्धिंगत करण्यावरही भर दिला जाणार आहे.
जागतिक तापमान वाढीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी वृक्ष प्राधिकरणामार्फत नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे इतर ठिकाणची परिस्थिती पाहता नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी स्थिरांकित आहे. भविष्यातदेखील पालिकेच्या माध्यमातून हाती घेतलेल्या उपक्रमांना लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी नागरिकांकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- अशोक पाटील, स्थायी समिती सभापती, नवी मुंबई महापालिका