योजनेच्या नावावरून महासभेत ‘रणसंग्राम’
उल्हासनगरमध्ये भाजप-शिवसेना आमनेसामने
उल्हासनगर ता. ३१ (वार्ताहर) : विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आखलेली कल्याणकारी योजना सोमवारी (ता. ३०) उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत राजकीय श्रेयाच्या लढाईत अडकली. योजनेच्या नामकरणावरून सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना गटात जोरदार खडाजंगी झाल्याने सभागृह अक्षरशः तापले होते. ‘सावित्रीबाई फुले की ज्योती कलानी?’ या नावाच्या वादामुळे योजनेपेक्षा राजकारणच अधिक चर्चेत राहिले.
महासभेत इयत्ता ७ वी ते १२ वीमधील विद्यार्थिनींना दरमहा ५०० रुपये शैक्षणिक मदत देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र, या योजनेच्या नावावरून दोन तट पडले. या योजनेला माजी आमदार स्वर्गीय ज्योती कलानी यांचे नाव देण्यावर शिवसेना गट ठाम होता. कलानी यांनी शहराच्या विकासात दिलेल्या योगदानाची आठवण या वेळी करून देण्यात आली, तर भाजपने या नामकरणाला विरोध दर्शवत, स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव या योजनेला देण्याची आग्रही मागणी केली.
महायुतीत ठिणगी
सत्तेत एकत्र असूनही दोन्ही पक्षांनी आपापल्या भूमिकेवर ताठरता दाखवल्याने सभागृहात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. विद्यार्थिनींच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याच्या या चांगल्या योजनेवर आता राजकीय वादाचे सावट पसरले आहे.
प्रशासनासमोर पेच
श्रेयवादाच्या या लढाईमुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पालिका प्रशासन यावर काय सुवर्णमध्य काढते आणि ही योजना कोणत्या नावाने कार्यान्वित होते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.