उत्पादन शुल्क कपातीचा लाभ सामान्यांना कधी?
मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल
डोंबिवली, ता. ३१ : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात जाहीर करूनही प्रत्यक्षात इंधन दरात कोणतीही घट झालेली नाही. यावरून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. ही कपात ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नसून, इंधन कंपन्यांना आर्थिक आधार देण्यासाठीच केली आहे का, असा खोचक सवाल त्यांनी समाजमाध्यमाद्वारे उपस्थित केला आहे.
आमदार राजू पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले, की उत्पादन शुल्कात मोठी कपात करूनही त्याचे प्रतिबिंब पेट्रोल पंपावरील दरांमध्ये उमटलेले नाही. सुमारे ९० रुपयांपर्यंतच्या तांत्रिक कपातीनंतरही इंधनाचे दर कमी न झाल्याने सामान्य नागरिकांच्या खर्चात कोणतीही घट झालेली नाही. आगामी पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दरवाढ रोखून धरण्यासाठीच हा टॅक्सचा खेळ सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. इंधन दरातील बदलांचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर आणि सर्वसामान्यांच्या बजेटवर होतो. त्यामुळे या गोंधळावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जाहीर केलेल्या कपातीचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांच्या खिशापर्यंत पोहोचवावा, अशी आग्रही मागणी आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
कंपन्यांच्या फायद्यासाठी निर्णय?
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना, देशांतर्गत कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी सरकारने हा मार्ग निवडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. निवडणुकीपूर्वी दरवाढ टाळण्यासाठी सरकारकडून अशी पावले उचलली जात आहेत, मात्र त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना मिळत नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.