तुर्भे, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका प्रशासनाने मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने बुधवारी (ता. १) महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन छेडले.
मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. ‘मराठी शाळा वाचवा’ आणि ‘आले १००, गेले १००, मराठी भाषा एकच नंबर’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधून घेतले. या वेळी बोलताना देसाई यांनी प्रशासन मराठी अस्मितेवर घाला घालत असल्याचा दावा केला. इंग्रजी भाषेतील शिक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, त्यासाठी मराठी शाळांचा बळी देणे आम्ही सहन करणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा उपस्थित केला. गेल्या काही वर्षांपासून अनेक शाळांचे फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट प्रलंबित असल्याचा दावा करत, अलीकडेच एका शाळेचा स्लॅब कोसळल्याची घटना प्रशासनाच्या निष्काळजीचे उदाहरण असल्याचे सांगितले. तसेच नवीन शाळा सुरू करण्याच्या घोषणा करण्यापेक्षा विद्यमान शाळांमधील स्वच्छता, इमारतींची दुरुस्ती आणि सुरक्षेकडे लक्ष देण्याची मागणी विशाल विचारे आणि विशाल ससाणे यांनी केली.