महसूल विभागात २३८ पदे रिक्त
ग्रामीण कामकाजावर ताण; नागरिकांना विलंबाचा फटका
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.२ : रायगड जिल्ह्यात महसूल विभागातील मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल या गावपातळीवरील महत्त्वाच्या पदांपैकी तब्बल २३८ पदे रिक्त असल्याचे समोर आले असून याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील कामकाजावर होत आहे. फेरफार नोंदी मंजूर करणे, वारस नोंदी, सरकारी योजनांची अंमलबजावणी, महसूल वसुली तसेच नैसर्गिक आपत्तीत पंचनामे करणे या कामांमध्ये विलंब होत असल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
महसूल यंत्रणेत मंडळ अधिकारी हे तलाठी व तहसीलदार यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात. जिल्ह्यात मंजूर ९० पदांपैकी १४ पदे रिक्त आहेत. तलाठी हे ग्राम महसूल प्रशासनाचे कणा असून ५१० पदांपैकी १०६ पदे रिक्त आहेत. कोतवाल या शेवटच्या घटकातील ३५१ पदांपैकी तब्बल ११८ पदे भरलेली नाहीत. त्यामुळे एकूण ९५१ पदांपैकी केवळ ७१३ पदांवरच कर्मचारी कार्यरत आहेत.
या रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. अनेक ठिकाणी एका अधिकाऱ्यावर अनेक गावांची जबाबदारी देण्यात आल्याने कामकाजात विलंब होत असून नागरिकांना वारंवार कार्यालयांचे फेरे मारावे लागत आहेत. विशेषतः शेतकरी व ग्रामीण नागरिकांना जमीनविषयक कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, शासनाने रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी जोर धरत असून, महसूल प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी भरती प्रक्रिया गतीमान करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे
चौकट :
रिक्त पदांचा आढावा
मंडळ अधिकारी : ९० मंजूर, ७६ कार्यरत, १४ रिक्त
तलाठी : ५१० मंजूर, ४०४ कार्यरत, १०६ रिक्त
कोतवाल : ३५१ मंजूर, २३३ कार्यरत, ११८ रिक्त
एकूण : ९५१ मंजूर, ७१३ कार्यरत, २३८ रिक्त