युद्धाच्या काळात भाजीपाल्याचा आधार
डहाणू तालुक्यात गवारच्या लागवडीकडे कल
कासा, ता. ३ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील शेतकरी बदलत्या शेती पद्धतीमुळे नगदी पिकांकडे वळताना दिसत आहेत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली भातपिकासोबत मिरची, काकडी, कलिंगडसारख्या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून, युद्धाच्या काळात गवार लागवडीतून शेतकऱ्यांना आधार मिळत आहे.
सायवन, दाभाडी, वांगरजे, बापूगाव, पिंपळशेत, धरमपूर या भागांतील अनेक गाव-पाड्यांमध्ये गवार, मिरची, टोमॅटो, चवळी यांसारख्या भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या पिकांसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. सध्या गवारला सरासरी २५ ते ३० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असून, गुजरात, मुंबई येथील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाठवली जात आहे, पण युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम बाजारपेठेवर होत असल्याने त्याचा फटका काही प्रमाणात भाज्यांचे भाव घसरले आहेत. -------------------------------
कष्टकरी दुर्लक्षित
डहाणू तालुक्यातील शेतकऱ्यांनी काळानुसार शेतीत बदल करून नगदी पिकांकडे वाटचाल केली असली तरी बाजारपेठेच्या अभावामुळे कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही. त्यामुळे तालुक्यात स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजारपेठ स्थापन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.
------------------------------
भात पिकानंतर गवारची लागवड केली आहे. दररोज २५० ते ३०० किलो उत्पादन मिळते. मात्र, व्यापाऱ्यांकडून कमी दर मिळतो. त्यामुळे तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती गरजेची आहे.
- रघुनाथ सुतार, शेतकरी