वाशी, ता. ६ (बातमीदार) : मुंबई एपीएमसीत राज्यातील विविध भागांतून उन्हाळी कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. घाऊक बाजारात कांद्याच्या भावात किलोमागे सुमारे चार ते पाच रुपयांची घट झाली असून, सध्या १५ ते १६ रुपयांवरून दर १० ते १२ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतून येणाऱ्या उन्हाळी कांद्यामुळे बाजारातील आवक २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी दररोज ९० ते १०० गाड्यांची आवक होत होती, ती आता वाढून १३० गाड्यांपर्यंत पोहोचली आहे. सोमवारी (ता. ६) तब्बल ३५ हजार ८२२ गोण्यांची नोंद झाली, जी सरासरीपेक्षा ३० टक्क्यांहून अधिक आहे.
किरकोळ व्यापाऱ्यांच्या मते, वाहतूक, हमाली, तोलाई आणि खराब माल यामुळे खर्च वाढतो. त्यामुळे कमी भावात विक्री करणे परवडत नाही. निर्यात सुरू होईपर्यंत बाजारात आवक अशीच राहण्याची शक्यता असून, पुढील दीड ते दोन महिने कांद्याचे भाव कमीच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घाऊक व्यापारी अशोक वाळुंज यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढत्या आवकेमुळे बाजारातील भावावर ताण निर्माण झाला असून, याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
निर्यात ठप्प असल्याचा परिणाम
निर्यात बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा स्थानिक बाजारपेठेत वळवला जात आहे. यामुळे पुरवठा वाढून भावावर दबाव आला आहे. गेल्या महिन्यात जेएनपीए बंदरात अडकलेला कांदाही एपीएमसीत विक्रीस आणण्यात आला होता. दरम्यान, घाऊक बाजारात भाव घसरले असले तरी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव अद्यापही २५ रुपये किलोच्या आसपास आहेत. घाऊक आणि किरकोळ भावांमध्ये सुमारे १० रुपयांचा फरक असल्याचे दिसून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.