अशुद्ध पाण्याने पोटाचे विकार
खोडाळा गावाचे जलशुद्धीकरण केंद्र बंद
मोखाडा, ता. ७ (बातमीदार) ः खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठला आहे. अशातच नळपाणी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र बंद पडल्याने गाळमिश्रित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. मोखाड्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी साठवण तलावाने तळ गाठला आहे. तर जलशुद्धीकरण केंद्रही बंद पडले आहे. त्यामुळे नळाद्वारे येणारे पाणी दुर्गंधीयुक्त, गाळमिश्रित असल्याने पोटाचे विकार तसेच संसर्गजन्य आजारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
----------------------------
दवंडीतून आवाहन
खोडाळा ग्रामपंचायत प्रशासनाने ध्वनिक्षेपकावरून दवंडी देत पाणी उकळून पिण्याचे आवाहन केले आहे. तसेच तलावात जाणाऱ्या जनावरांच्या मालकांवर तसेच कपडे धुणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.