ठाण्यात पाणीसाठा पुरेसा; तरीही १५ दिवसांचा ‘शटडाऊन’ कायम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : शहरातील काही भागांत सध्या पाणीटंचाई जाणवत असली, तरी एकूण पाणीसाठा समाधानकारक आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्यात मोठे पाणीसंकट निर्माण होणार नाही, असा विश्वास ठाणे महापालिकेने व्यक्त केला आहे. धरणांमधील उपलब्ध साठा पावसाळा सुरू होईपर्यंत पुरेसा ठरेल, असा दावा प्रशासनाने केला असला, तरी दर १५ दिवसांनी घेतला जाणारा नियोजित शटडाऊन मात्र पुढेही कायम राहणार आहे.
ठाण्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, ती आता २७ लाखांच्या घरात पोहोचली आहे. शहरासाठी दररोज ६१६ दशलक्ष लिटर पाण्याचा कोटा मंजूर असला, तरी प्रत्यक्षात ५९० दशलक्ष लिटर पुरवठा केला जातो. महापालिकेला स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी, मुंबई महापालिका आणि स्वतःच्या योजनांमधून पाणी मिळते; मात्र घोडबंदर, पाचपाखाडी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांत वारंवार पाणीटंचाईच्या तक्रारी येत आहेत.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच काही भागांत पाणीटंचाईचे चित्र दिसत आहे. ही तीव्रता कमी करण्यासाठी पालिकेने पावसाळ्यानंतर दर १५ दिवसांनी दोन टप्प्यांत शटडाऊन घेण्याची पद्धत सुरू केली आहे. या नियोजनामुळे पाण्याचा साठा पावसाळा लांबला तरी पुरेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
भविष्यातील तहान मोठी
वाढती लोकसंख्या आणि गृहप्रकल्पांमुळे भविष्यात पाण्याची मागणी प्रचंड वाढणार आहे. महापालिकेने तयार केलेल्या ३० वर्षांच्या दीर्घकालीन आराखड्यानुसार, शहराला भविष्यात दररोज १११६ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने आतापासूनच स्रोत शोधण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.