उन्हाळी भातशेतीचे वरदान
१०० गावातील भातकापणीस सुरुवात
कासा, ता. ७ (बातमीदार) ः डहाणू तालुक्यातील धामणे येथील सूर्या प्रकल्पातून उजव्या, डाव्या कालव्यांद्वारे सिंचनासाठी पाणी दिले जाते. या पाण्यावर जवळपास १०० गावातील भातशेती बहरली आहे.
सूर्या प्रकल्पातून शेतीसह वसई-विरार, मिरा-भाईंदरला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. पावसाळ्यातील भातशेतीपेक्षा उन्हाळ्यातील भातपीक जोमदार येत असल्याचे शेतकरी सांगतात. पावसाळ्यात पूर, रोगराईचा धोका असतो. मात्र, उन्हाळ्यात उत्पादन चांगले मिळते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी भात शेतीला प्राधान्य देत आहेत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने सुधारित जातींच्या बियाण्यांचा वापर केल्याने उत्पादनात वाढ होत आहे.
------------------------------
वर्षभराच्या अन्नाची सोय
सध्या खत देण्याचा हंगाम सुरू झाल्याने कासा परिसरातील कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. युरिया व इतर खतांच्या खरेदीसाठी शेतकरी सकाळपासूनच रांगा लावत असल्याचे चित्र आहे. भातशेती खर्चिक असली तरी पारंपरिक पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल कायम आहे. या पिकातून मिळणारा भात वर्षभराच्या अन्नासाठी उपयोगी पडत असल्याचे शेतकरी सांगतात.
---------------------------------
रोजगारनिर्मितीला चालना
वाघाडी, वेती, वरोती, कासा, तवा, सारणी, उर्से, आंबेदा, पेठ, नाणीवली, रानशेत या भागांत मोठ्या प्रमाणात भातशेतीची लागवड करण्यात आली आहे. यासोबतच भाजीपाला व फुलशेतीत मोगरा, झेंडूची लागवड करून शेतकरी आपले उत्पन्न वाढवत आहेत. उन्हाळी शेतीमुळे ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून, पूर्वी स्थलांतर करणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही घटल्याचे दिसून येते.
----------------------
उन्हाळी भातशेती सध्या बहरली असून, महिनाभरात कापणी सुरू होईल. पावसाळ्यात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते; मात्र उन्हाळ्यात चांगले पीक मिळाल्याने आर्थिक फायदा होतो.
- संजय पाटील, शेतकरी