भिवंडीतील नाले सफाईच्या प्रतीक्षेत
कचरा ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे घाणीचे साम्राज्य
भिवंडी, ता. ७ (बातमीदार)
भिवंडी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे शहरातील गटारे आणि नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत. पावसाळा तोंडावर आला असतानाही अद्याप सफाईची कामे सुरू न झाल्याने, यंदाही शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याची भीती व्यक्त होत आहे. कचरा उचलण्यासाठी नियमित घंटागाड्या येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
शहरातील अनेक भागात पालिकेच्या घंटागाड्या वेळेवर येत नाहीत. परिणामी, नागरिक आणि व्यापारी रस्त्याच्या कडेला किंवा सोसायट्यांच्या डसबिनमध्ये कचरा टाकत आहेत. यामुळे शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत कचराकुंड्या तयार झाल्या आहेत. रस्त्यावर झाडू मारणारे सफाई कामगारही गायब असल्याने सर्वत्र कचरा साचलेला असतो. स्वच्छता निरीक्षकांचे आपल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.
नाल्यांमध्ये उद्योगांचा कचरा
शहरातील काही नाले उघडे, तर काही बंदिस्त आहेत. या नाल्यांच्या कडेला असलेल्या यंत्रमाग कारखान्यांमधील कचरा, डाइंग आणि मोती कारखान्यांमधील रसायने थेट नाल्यात सोडली जातात. वंजारपट्टी नाका ते नदीनाका यादरम्यान असलेल्या मेट्रो हॉटेलमागील नाल्यात घाऊक भाजीपाला विक्रेते उरलेला कचरा टाकून देतात. यामुळे हा नाला पूर्णपणे चोंदला असून, या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
प्रशासकीय हालचाली संथ
यासंदर्भात आरोग्य व स्वच्छता निरीक्षक फैजल तातली यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रातील नालेसफाईसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. तसेच सफाई कामगारांना नियमित कामाच्या सूचना देऊन घंटागाड्यांच्या फेऱ्यांचा आढावा घेतला जाईल. प्रशासनाने तातडीने नालेसफाई आणि कचरा व्यवस्थापनाकडे लक्ष दिले नाही, तर पहिल्याच पावसात भिवंडीकरांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.