नियमबाह्य रिक्षाचालकांवर कारवाई
डोंबिवलीत २० चालकांना ठोठावला दंड
डोंबिवली, ता. ८ : शहरातील प्रवासी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून, डोंबिवलीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. आरटीओच्या या धडक मोहिमेमुळे बेकायदा रिक्षा चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, अनेक चालकांनी कारवाईच्या भीतीने स्थानक परिसर सोडून पळ काढला.
राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार, कल्याण-डोंबिवली परिसरात ही तपासणी मोहीम राबवण्यात आली. आरटीओच्या पथकाने डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर आणि मुख्य चौकांमध्ये नाकाबंदी करून रिक्षांच्या कागदपत्रांची आणि परवान्यांची कसून पडताळणी केली.
गणवेशाचा अभाव
अनेक रिक्षाचालक विहित गणवेशात नसल्याचे आढळून आले. तसेच काही चालकांकडे वैध परवाना, विमा आणि आवश्यक परमिट नसल्याचे निष्पन्न झाले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना दोन ते चार हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात आला. तपासणीदरम्यान काही चालकांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घालत कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला; मात्र आरटीओ पथकाने त्यांना रोखून धरत कडक कारवाई केली.
परवाना निलंबनाचा इशारा
शहरात विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर आमची करडी नजर आहे. ज्या चालकांनी दंड भरण्यास टाळाटाळ केली, त्यांच्या रिक्षा जप्त करून आरटीओ कार्यालयात जमा करण्यात येतील. यापुढेही अशा मोहिमा नियमितपणे राबवण्यात येतील आणि वारंवार नियम मोडणाऱ्यांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित केले जातील, असा इशारा कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिला आहे.