महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
विक्रमगड, ता. १५ (बातमीदार) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक व दलितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती विक्रमगड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या वेळी उपस्थितांनी त्यांच्या विचारांचे स्मरण करून सामाजिक समता, शिक्षण आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाजप विक्रमगड तालुका अध्यक्ष रवींद्र भडांगे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा सरचिटणीस सुशिल औसरकर, माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीपभाऊ पावडे, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर खुताडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश (तात्या) आळशी, आर्थिक आघाडी जिल्हाध्यक्ष मंगेश औसरकर, युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदोष आळशी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच नगरसेवक विजय मेघवाली, तालुका सरचिटणीस निशिकांत संखे, ज्येष्ठ नागरिक एकनाथ ढाले गुरुजी, आध्यात्मिक आघाडीचे तालुका अध्यक्ष सुरेश देवळे आणि कार्यक्रम संयोजक राहुल मोरे यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या वेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली गरज अधोरेखित केली. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सामाजिक समतेचा संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.