पाणीटंचाई सोडवण्यासाठी सभापती थेट गावात
नमिता घारे यांचा आर्ढे गावात अधिकाऱ्यांसह पाहणी दौरा
कर्जत, ता. १६ (बातमीदार)ः कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील आर्ढे गावात तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. याकडे पंचायत समितीच्या सभापती नमिता घारे यांनी तातडीने लक्ष देत थेट गावात भेट दिली असून, प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, तालुकाभरात या कामाचे कौतुक होत आहे.
आर्ढे गावात सुमारे १,४०० ते १,५०० नागरिकांची वस्ती असून, लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून धरणाजवळ बंधारा उभारून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, अलीकडील काळात पाण्याचा साठा अत्यल्प असल्याने महिलांना पाणी भरण्यासाठी उन्हात पायपीट करावी लागत होती. कपडे धुण्यासाठीही विहिरी किंवा बंधाऱ्याजवळ जावे लागत होते. या समस्येबाबत ग्रामस्थांनी नमिता घारे यांच्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची दखल घेत नमिता घारे यांनी बुधवारी (ता. १५) गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सुजित धनगर, विस्तार अधिकारी उज्वला भोसले यांच्यासह गावात भेट देत परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि ग्रामस्थांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या. ग्रामस्थांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आजपर्यंत प्रथमच सभापती स्वतः गावात येऊन आमच्या समस्या जाणून घेत आहेत. ही आमच्यासाठी ऐतिहासिक बाब आहे. सभापतींच्या या पुढाकारामुळे दुर्गम भागातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. नमिता घारे यांनी येत्या काही दिवसांतच पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले असून, त्यांच्या या तत्पर आणि लोकाभिमुख कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जलजीवन योजनेच्या कामाचाही आढावा
१ संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत.
२ रखडलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. ही योजना लवकर पूर्ण करून गावाला नियमित पाणीपुरवठा मिळावा, यासाठी कामांना गती देण्याचे आदेश देण्यात आले.