भिवंडी, ता. १६ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेच्या शाळांमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा गंभीर अभाव असल्याने विद्यार्थ्यांची आणि शाळा इमारतींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शहरातील ८६ प्राथमिक आणि ११ माध्यमिक अशा एकूण ९७ शाळा ४६ इमारतींमध्ये आहेत. त्यात २४ हजार ५६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने आणि सुरक्षा रक्षकांची नियुक्ती न झाल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक असतानाही भिवंडीतील बहुतांश पालिका शाळांमध्ये ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे शाळा परिसरात घडणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. एकीकडे शाळा डिजिटल करण्याचे नियोजन सुरू असताना, मूलभूत सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. अनेक शाळा इमारतींमध्ये लोखंडी ग्रील नाही. दरवाजे-खिडक्या कमकुवत अवस्थेत असल्याने शाळांमधील मौल्यवान साहित्य व शैक्षणिक कागदपत्रे धोक्यात आहेत. या पार्श्वभूमीवर पालक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
रात्री नशेबाजांचा वावर
शाळांच्या परिसरात रात्री कोणतीही सुरक्षा नसल्याने नशेबाज व गर्दुल्ल्यांचा वावर वाढत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. यामुळे चोरी किंवा तोडफोडीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवकांनी शाळांमध्ये सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली आहे.
सीसीटीव्हीसाठी प्रस्ताव
पालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ५१ शाळा इमारतींमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी विद्युत विभागाने सर्वेक्षण पूर्ण केले आहे. सुमारे ७५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.