मुरबाड, ता. १६ (वार्ताहर) : मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील अनेक आदिवासी बांधवांना दरवर्षी उन्हाळ्यात रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यांकडे स्थलांतर करावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. स्थानिक पातळीवर शेती व इतर रोजगाराच्या संधी अपुऱ्या असल्याने ही परिस्थिती निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील चेअरपोली येथील सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांनी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांना निवेदनाद्वारे समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
पाटील यांनी निवेदनात नमूद केले की, मुरबाड व शहापूर परिसरातील अनेक आदिवासी कुटुंबे रोजगाराअभावी उन्हाळ्याच्या काळात शेतीकामासाठी इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतर करतात. यामुळे त्यांच्या मुलांजं शिक्षण, आरोग्य आणि कुटुंबाच्या सामाजिक स्थैर्यावर विपरीत परिणाम होत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती करणे, मनरेगा अंतर्गत कामे प्रभावीपणे राबविणे, लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे तसेच पाणी उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.
आदिवासी बांधवांना त्यांच्या गावातच वर्षभर रोजगार उपलब्ध करून दिल्यास स्थलांतराची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या निवेदनाची दखल घेऊन सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.