मराठीचा आदर प्रत्यक्षातही दिसायला हवा
मनसे नेते अविनाश जाधव यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : मराठी भाषेचा आदर केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षातही दिसायला हवा, असे मत मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केले आहे. तसेच गरज भासल्यास रिक्षाचालकांना मराठी शिकवण्यासाठी प्रयत्न केले जावेत, असेही जाधव यांनी या वेळी सुचवले.
येत्या १ मेपासून रिक्षाचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाचे स्वागत करत, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी अभिनंदन केले. तसेच सपा नेते अबू आझमी यांच्या भूमिकेवर टीका करताना जाधव म्हणाले की, काही लोक भाषा आणि धर्माच्या मुद्द्यांवरून राजकारण करतात. अशा वक्तव्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाशिकमधील घटनेबाबत त्यांनी ती दुर्दैवी असल्याचे म्हटले. ठाण्यातील विविध कार्यालयांमध्ये महाराष्ट्र सैनिकांकडून निवेदन दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी करत महिलांसाठी स्वतंत्र पथक तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, रस्ता रुंदीकरण करूनही समस्या सुटलेली नाही. काही ठिकाणी ‘बॉटलनेक’ असल्याने वाहतूक अडते. विशेषतः वाघबीळ नाका ते हिरानंदानी परिसरात असलेल्या सिग्नल्समुळे कोंडी वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. जोपर्यंत हे अडथळे दूर होत नाहीत, तोपर्यंत समस्या कायम राहील, असेही मत जाधव यांनी व्यक्त केले.