उड्डाणपुलासाठी रास्ता रोको
शाळकरी मुलांसह नागरिकांचा एल्गार
तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : तुर्भे स्टोअर परिसरात प्रलंबित उड्डाणपुलाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. १६) ठाणे-बेलापूर मार्गावर रहिवाशांनी जनआंदोलन छेडले. विशेष म्हणजे, या निदर्शनांमध्ये शाळकरी मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आम्हाला सुरक्षित रस्ता द्या, अशी मागणी केली. या आंदोलनामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. हे काम काळ्या यादीत असलेल्या ठेकेदाराला देण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. संबंधित ठेकेदाराने ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे मुश्कील झाले आहे. यामुळे आतापर्यंत ४० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून, १०० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत, असा दावा या वेळी करण्यात आला. लोक अधिकार एनजीओचे ठाणे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण खोपडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी आंदोलकांनी विविध मागण्या मांडल्या.
तीव्र आंदोलनाचा इशारा
ठाणे-बेलापूर मार्गावर अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, तसेच या मृत्यूंसाठी मनपा प्रशासनाच्या हलगर्जीला जबाबदार धरून शहर अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. बेलापूरकडून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी घालावी, रस्त्यावरील अनधिकृत टेम्पो स्टँड हटवावेत आणि धोकादायक पुलांखालील अनधिकृत वाहनतळ बंद करावेत, अशा मागण्याही आंदोलकांनी केल्या. मागण्या मान्य न झाल्यास नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बाळकृष्ण खोपडे यांनी दिला.