कर्जत तालुक्यात उत्खननाचा पहिला गुन्हा शेतकऱ्यावरच
कर्जत, ता. १६ (बातमीदार) ः कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध उत्खनन प्रकरणात प्रशासनाने पहिली कारवाई स्थानिक शेतकऱ्यावर केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मोठ्या धनिकांकडून पर्यावरणाची हानी व शासनाचा महसूल बुडवला जात असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरीवर्गातून केला जात आहे.
पळसदरी-तळवली येथील शेतकरी किशोर आव्हाड यांच्यावर उत्खननप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा भाग इको-सेन्सिटिव्ह झोन असल्याचे कारण देत प्रशासनाने ही कारवाई केली; मात्र याच परिसरात मोठ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात उत्खनन करूनही धनिकांना मोकळीक दिली जात असल्याचा आरोप होत आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या कामकाजावरही संशय व्यक्त केला जात असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, एका शेतकऱ्यावरच कारवाई करून प्रशासन दुजाभाव करत असल्याची भावना स्थानिक शेतकरीवर्गात निर्माण झाली आहे. मोठ्यांना सूट आणि छोट्यांवर कारवाई, अशी भूमिका का घेतली जाते, असा सवाल आता जोर धरत असून याप्रकरणी वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित उत्खननाबाबत पंचनामा सुरू असून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आवश्यक तेथे गुन्हा दाखल करण्यात येईल.
- धनंजय जाधव, तहसीलदार, कर्जत