खैरानी रोडवरील बसथांबे गायब; प्रवासी अडचणीत
घाटकोपर, ता. २३ (बातमीदार) : मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या बेस्ट सेवेचा लाभ दररोज लाखो प्रवासी घेतात; मात्र बेस्ट प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे. घाटकोपर (पश्चिम) येथील खैरानी रोडवर जांभूळपाडा ते साकीनाकादरम्यान अनेक ठिकाणी बसथांबे गायब झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
या मार्गावरील बसथांब्यांचे फलक लोखंडी खांबांसह अनेक दिवसांपासून नाहीसे झाले आहेत. काही ठिकाणी केवळ लोखंडी खांब उभे असून फलकच नसल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी थांब्यांची नावे व बस क्रमांक पूर्णपणे पुसट झाले आहेत. साकीनाका पोस्ट ऑफिसजवळील थांबा तर झाडाला बांधून ठेवण्यात आल्याचे चित्र आहे.
या मार्गावरून बेस्टच्या ४१९, ४२१ आणि ४२७ क्रमांकाच्या बस धावतात. जांभूळपाडा, जंगलेश्वर मंदिर, खैरानी बाग आणि साकीनाका पोस्ट ऑफिस या ठिकाणी बसथांबे स्पष्ट नसल्यामुळे प्रवाशांना नेमके कुठे उभे राहायचे, याबाबत संभ्रम निर्माण होतो. परिणामी, अनेकदा बस एका ठिकाणी थांबते तर प्रवासी दुसऱ्या ठिकाणी उभे राहिल्याने धावपळ करावी लागते.
या परिस्थितीमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. बेस्ट प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संबंधित बसथांबे तातडीने दुरुस्त व पुन्हा उभारण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.