औद्योगिक सुरक्षेसंदर्भात समन्वयाची गरज
नीलम गोऱ्हे यांची भेट; मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
वाडा, ता. २३ (बातमीदार)ः पालघरसह राज्यातील ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे उभारले जाणारे औद्योगिक कारखाने रोखायला हवेत. अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत म्हणून महसूल, पोलिस व औद्योगिक विभाग या यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज व्यक्त केली. वाड्यातील कोनसई येथील अवैध फटाका कारखान्यात स्फोट होऊन झालेल्या दुर्घटना स्थळाची त्यांनी पाहणी केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
वाड्यातील अवैध फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात मंगळवारी (ता. २१) दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. या घटनेची पाहणी केल्यानंतर उपसभापती गोऱ्हे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेची माहिती जाणून घेतली. या घटनेशी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचा सूर गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत लावल्याने प्रत्यक्षात दोषींवर कारवाई होईल का? याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाला सूचना देणार असून, त्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
कोनसई येथील फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या भावेश वावर व मोनिका पडवळे यांच्या कुटुंबीयांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. केंद्र व राज्य सरकारकडे अधिक आर्थिक मदत मिळावी म्हणून पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
घरांचे नुकसान; ४०० कोंबड्यांचा मृत्यू
कारखान्यातील स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत गेला. स्फोटामुळे जवळच्या घरांना तडे गेले, खिडक्यांचा काचा फुटल्या आणि पंखे निखळल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. कारखान्यापासून काही मीटर अंतरावर असलेल्या पोल्ट्री फाॅर्ममधील साधारणत ४०० कोंबड्या आवाजाने मृत्युमुखी पडल्या. दरम्यान, या स्फोटाचा फटका गावालाही बसला असल्याने गावानजीक असे कारखाने नको, अशी मागणी नागरिक करीत आहेत.