ठाणे, ता. २३ : शहरातील कापूरबावडी, बाळकुम आणि कासारवडवली परिसरात घडलेल्या तीन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. सर्वच प्रकरणांत वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या घटनांमुळे बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कापूरबावडी परिसरात २० एप्रिलला रात्री उशिरा झालेल्या अपघातात भांडुप येथील अतुल पांडे (३१) यांच्या दुचाकीला टॅक्सी परमिट असलेल्या कारने दिलेल्या धडकेत आई रेणु पांडे (५३) जखमी झाल्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना २१ एप्रिलला दुपारी बाळकुम येथे घडली. भिवंडीतील दीपेश मोरे (२४) या डिलिव्हरी बॉयला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या हात व पायाला दुखापत झाली असून चालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणीही कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिसरी घटना १८ एप्रिलला कासारवडवली परिसरात घडली. भिवंडीतील अनिल रायकर (३५) हे पायी जाताना भरधाव चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन सहा ठिकाणी फॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चालक फरार आहे. दरम्यान, तिन्ही घटनांतील फरार वाहनचालकांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.