कोनसई स्फोटाची जबाबदारी प्रशासनाची
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांचा आरोप
वाडा, ता. २४ (बातमीदार) ः कोनसई येथील बेकायदा फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला तर पाच कामगार जखमी झाले आहेत. या घटनेला जिल्हा प्रशासन जबाबदार असून ना हरकत देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडून काढून घेतल्याने प्रदूषणकारी कारखान्यांना रान मोकळे झाल्याचा आरोप काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केला आहे.
पेसा क्षेत्रातील ग्रामसभेच्या मान्यतेसह ग्रामपंचायत ना हरकत दाखल्यासाठी मोठ्या प्रमाणावर विलंब होत असल्याची तक्रार उद्योजकांनी पालघर जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या वेळी जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाचा गैरफायदा घेत उद्योजक मनमानीपणे उद्योग उभारत असल्याचा आरोप प्रफुल पाटील यांनी केला आहे. तसेच कोनसई दुर्घटनेतील मृतांना १० लाख रुपये, जखमींना पाच लाख रुपये शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-----------------------------
परिपत्रकावरून वाद
क्रमांक महसूल/क-१/टे-२/एनएपी/कावि ४००/२०२५ १८/११/२०२५ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकात ग्रामपंचायतीकडे ‘ना हरकत प्रमाणपत्र’देण्याचे अधिकार काढून घेत महाराष्ट्र नगररचना अधिनियम १९६६चे कलम १८ अन्वये ग्रामीण भागातील गावठण क्षेत्राव्यतिरिक्त इतर क्षेत्रासाठी जिल्हाधिकारी विकास अधिकारी असल्याचा दाखला देत स्वतःकडे केंद्रित केले होते.