आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ
तीन कोटी ६१ लाख १५ हजार अनुदानाचे ७२३ जोडप्यांना वाटप
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत जातीय भेदभाव कमी करण्यासाठी आणि सामाजिक समानता वाढवण्यासाठी विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजारांचे अनुदान दिले जाते. २०२३ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ७२३ पात्र लाभार्थ्यांना एकूण तीन कोटी ६१ लाख १५ हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले.
समाजातील दरी कमी करण्याबरोबरच जातीय सलोखा राखण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजना राबविली जाते. अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातींपैकी एक आणि दुसरी हिंदू, लिंगायत, जैन, शीख म्हणजे सवर्ण धर्मातील व्यक्ती असल्यास त्यांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ दिला जातो. अस्पृश्यता निवारणाचा एक भाग म्हणून आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली.
या योजनेला रायगड जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेकडो जोडप्यांकडून अर्ज केले जात आहे. त्याची पडताळणी, तपासणी केल्यावर लाभार्थी पात्र ठरविले जातात. शासनाकडून येणाऱ्या निधीद्वारे ५० हजारांचे अनुदान दिले जाते. २०२३-२४ या वर्षात एकूण १९२ लाभार्थ्यांना ९६ लाख रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले. २०२४-२५ या वर्षात एकूण तीन वेळा टप्प्याटप्प्याने एक कोटी ४४ लाखांचा निधी राज्य शासनाकडून आला. त्याचे २८८ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यानंतर २०२५-२०२६ या वर्षासाठी निधी राज्य शासनाकडून आला असून, फेब्रुवारी २०२६ पर्यंत एकूण २४३ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती राजिप समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे. असा एकूण तीन कोटी ६१ लाख १५ हजारांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
चौकट
वर्ष लाभार्थी वितरित निधी
२०२३-२४ १९२ ९६ लक्ष
२०२४-२५ ५८ २९ लक्ष
२०२४-२५ १६९ ८४.५० लक्ष
२०२४-२५ ६१ ३०.५० लक्ष
२०२५- २०२६ २४३ १ कोटी २१ लक्ष १५ हजार
चौकट
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी
- जोडपे महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
- विवाह करणाऱ्या जोडप्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. त्याच्याकडे संबंधित जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- विवाह नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- विवाह करताना वधूचे वय किमान १८ वर्षे आणि वराचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
चौकट :
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे:
१. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
२. वर आणि वधू यांचा शाळा सोडल्याचा दाखला
३. जातीचा दाखला
४. वर आणि वधू यांचे एकत्रित फोटो
५. दोन प्रतिष्ठित व्यक्तींची शिफारसपत्रे
६. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा
प्रतिक्रिया
समाजातील दरी कमी करण्याबरोबरच जातीय सलोखा राखण्यासाठी राज्य शासनाकडून रायगड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजना राबविली जाते. या योजनेमुळे या जोडप्यांना आर्थिक आधारही मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त जोडप्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
- नारायण डामसे, समाजकल्याण समिती सभापती, रायगड जिल्हा परिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.