वधना-वाणगाव मार्गावर अवजड वाहनांची वाढती वर्दळ; रस्त्याची दुरवस्था, अपघातांचा धोका वाढतोय
तारापूर बातमीदार
डहाणू तालुक्यातील वधना-वाणगाव मुख्य मार्गाची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून, खड्ड्यांचे साम्राज्य आणि अतिरिक्त अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरील वाढत्या अपघातांच्या शक्यतेमुळे वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.
वधना-वाणगाव मुख्य मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून, खड्ड्यांनी भरलेला आहे. वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांनी विद्रूप झालेल्या या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. ऐना खिंडीपाडा परिसरात वाहनातील खडी रस्त्यावर सांडल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. मागील तीन दिवसांपासून सदर अवजड वाहन एकाच ठिकाणी बंद अवस्थेत असल्याने वाहनचालकांकडून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संभाव्य अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे. वधना ते गोवणा यादरम्यान रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, खड्ड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, वधना-वाणगाव रस्ता नव्याने तयार करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती अभियंता मनीष चकधरे यांनी दिली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच, अवजड वाहनांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.
कोट :
प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अवजड वाहनांमुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढत असून, खड्ड्यांमुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे. पावसाळ्यात धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने योग्य ती दखल घेत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून रस्ता खड्डेमुक्त करावा.
- सुदाम मेरे, उपसरपंच,
निकणे ग्रामपंचायत