शेतकरी मेटाकुटीला
बियाणे आणि औषधांच्या दरात मोठी वाढ
जव्हार, ता. २८ (बातमीदार) : तालुक्यातील ग्रामीण भागात शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. मुसळधार पाऊस पडणाऱ्या या भागात पाणी अडविण्याचे कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्याने केवळ या भागात खरीप हंगामात शेतीची कामे केली जातात. खरीप हंगाम संपल्यानंतर येथील शेतकरी हा पोटाची खळगी भरण्यासाठी शहराकडे कुटुंबासहित स्थलांतरित होत असतो. अशी साधारण आर्थिक परिस्थिती अवलंबून असलेल्या या भागात यंदा शेतीसाठी उपयुक्त बियाणे आणि औषधांच्या दरात प्रचंड वाढ झाल्याने येथील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
सध्या खरीप हंगामाची चाहूल लागलेली असतानाच बळीराजासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि कृषी निविष्ठांच्या किमतीत गेल्या काही दिवसांत कंपन्यांनी भरघोस वाढ केल्याने शेतीचा उत्पादन खर्च गगनाला भिडणार आहे. अगोदरच बेमोसमी पाऊस, अस्मानी संकटाने त्रासलेल्या शेतकऱ्याला युद्धजन्य परिस्थितीत शेतीपयोगी लागणारे वस्तू खरेदी करताना चांगलीच कसरत होणार आहे.
-------------
तर दरवाढ कशा?
आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्राईल, इराण आणि आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ही दरवाढ झाल्याचे कंपन्यांकडून भासविले जात असले, तरी शेतकरी आणि तज्ज्ञांनी हा दावा फेटाळून लावला आहे. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठांची निर्मिती कंपन्या डिसेंबर ते जानेवारीपासूनच सुरू करतात, तर युद्ध मार्चमध्ये सुरू झाले. मग एप्रिलपासूनच ही दरवाढ कशी लागू झाली, असा प्रश्न संतप्त शेतकरी विचारत आहेत. ज्या वस्तूंच्या उत्पादनासाठी कच्चे तेल किंवा आयातीवर अवलंबून राहावे लागत नाही, त्यांच्याही किमती का वाढवल्या गेल्या, याचे कोडे अद्याप सुटलेले नाही.
-------------
शेती धोक्यात येण्याची चिन्हे
उत्पादनावर येणारा प्रचंड खर्च आणि प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती राहिली, तर भविष्यात शेती व्यवसाय पूर्णपणे तोट्यात जाऊन शेतकरी आत्महत्येकडे वळण्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक खासदार, आमदार आणि मंत्र्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन विधानसभा व लोकसभेत हा आवाज उठवावा आणि या दरवाढीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आता जव्हार भागात जोर धरू लागली आहे.
-----------------
जागतिक बाजारपेठेत दर स्थिर असताना केवळ भारतातच ही भाव वाढ का? केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळेच या कंपन्यांचे फावले आहे. सरकार जाणीवपूर्वक शेतीव्यवसाय अडचणीत आणत असल्याचा आरोप आता शेतकरीबांधवांकडून होऊ लागला आहे.
- प्रदीप वाघ, माजी सभापती
------------------
काही उत्पादनांना ठोस कारण नसताना दरवाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतात ही वाढ जास्त आहे. आता शेतकरीबांधवांमध्ये भारतीय कंपन्यांच्या आणि योग्य दरातील दर्जेदार खतांचा पर्याय निवडण्याबाबत चर्चा सुरू आहे.
- प्राजक्ता शिंगडा, सरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.