हक्काच्या शिक्षणात खंड
जिल्ह्यात ५७ शाळांमधील नववी-दहावीचे वर्ग बंद
पालघर, ता. ४ ः शिक्षणाच्या प्रवाहातून विद्यार्थी बाहेर जाऊ नये, या उद्देशाने आठवीच्या शाळांना जोडून नववी दहावीचे वर्ग जिल्हा परिषदेने सुरू केले होते. मात्र, या वर्गातील शिक्षकांच्या वेतनाचा मुद्दा उपस्थित झाल्याने ५७ शाळांमधील वर्ग बंद करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम भागातील शाळांमधील ९वी, १०वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसामोर मोठ अडचण निर्माण झाली आहे. टप्प्याटप्प्याने हे बंद केले जाणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना जवळच्या खासगी माध्यमिक शाळा किंवा शासकीय आश्रमशाळांमध्ये समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी पर्यायी शाळा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना लांब अंतर पार करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षणात खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
-----------------------
पालकांवर आर्थिक भार
दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अधिक त्रासदायक ठरत आहे. वाहतूक सुविधा अपुऱ्या असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती पालक व्यक्त करत आहेत. याशिवाय नव्या खासगी शाळांमध्ये प्रवेश, फी, वह्या-पुस्तके यांचा अतिरिक्त आर्थिक भारही पालकांवर पडणार आहे.
--------------------------
वेतनाबाबत अनिश्चितता
आठवी उतीर्ण झाल्यानंतर नववी, दहावीच्या शाळा केवळ तालुक्याच्या ठिकाणी होत्या. हजारो मुले शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जात होती. याच अनुषंगाने नववीसह दहावीचे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर जिल्हा परिषदेने मंजूर केला. असे वर्ग उघडणारी पालघर जिल्हा परिषद राज्यात एकमेव होती. मात्र, कंत्राटी शिक्षकांच्या वेतनाबाबत निश्चितता नसल्याने वर्ग बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे.
----------------------------
निर्णयाचा परिणाम
या निर्णयामुळे संबंधित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी शिक्षकांवरही गंडांतर आले आहे. त्यांच्या सेवांना समाप्त करण्याबाबत प्रक्रिया सुरू असून, अनेक शिक्षक बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या निर्णयाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
--------------------------
शैक्षणिक वर्ष संपल्याने हे वर्ग तूर्तास बंद केले आहेत. मंजुरीचा प्रस्ताव राज्याकडे सादर असून, मार्गदर्शक सूचना-मंजुरी आल्यानंतर पुन्हा वर्ग सुरू केले जातील.
- मनोज रानडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर
----------------------
हा निर्णय चुकीचा असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. निर्णय रद्द केला गेला नाही, तर शिक्षण विभागाविरोधात आंदोलन केले जाईल.
- विनोद निकोले, आमदार
--------------------------------
मानधनावरील कंत्राटी शिक्षक
जव्हार १९, मोखाडा ३, विक्रमगड ७, तलासरी २२, डहाणू ९, वाडा ३, वसई ४, पालघर २
शाळा - ५७, शिक्षक - ६९, विद्यार्थी - ६ हजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.