धामणी धरणात ३६ टक्के साठा
कडक उन्हाळ्यामुळे प्रशासन सतर्क
कासा, ता. ४ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यातील महत्त्वाच्या जलस्रोतांपैकी एक असलेल्या धामणी, कवडास धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. तापमानात वाढ झाल्याने दोन्ही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
धामणी धरणाची सध्याची पातळी १०४.४९५ मीटर आहे. त्यामध्ये १०१.२२० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा धरणाच्या एकूण क्षमतेच्या ३६.५५ टक्के इतकाच आहे. गेल्या वर्षी २ मे रोजी धामणी धरणात ४०.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा त्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने काही आठवड्यांत जलसाठ्यावर ताण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची संभाव्य परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जलसंपदा विभागाने नागरिकांना केले आहे.
--------------------------
सध्याचा पाणीसाठा पुरेसा असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे.
-प्रवीण भुसारे, अभियंता