शहरातील अस्थमा रुग्णांबाबत तज्ज्ञांचा इशारा
लवकर निदान आणि ठोस उपाययोजनांची गरज
विरार, ता. ६ (बातमीदार) : मंगळवारी (ता. ५) जागतिक दमा (अस्थमा) दिनानिमित्त जनजागृती करण्यात आली. या वेळी आघाडीच्या श्वसन तज्ज्ञांनी शहरात दमा आणि इतर दीर्घकालीन श्वसन आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यांनी जनजागृती वाढवणे, लवकर निदान करणे आणि सातत्याने प्रतिबंधात्मक उपाय राबवण्याची गरज अधोरेखित केली.
वसई-विरार, मिरा-भाईंदर आणि मुंबईमध्ये वाहनांचे धूर, बांधकामातील धूळ आणि बदलते हवामान यामुळे वायू प्रदूषण सतत उच्च पातळीवर आहे. याचा परिणाम सर्व वयोगटांमध्ये श्वसन आजारांच्या वाढत्या घटनांमध्ये दिसून येत आहे. प्रदूषित हवा ही दम्याचा प्रमुख ट्रिगर ठरते, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास, शिटीसारखा आवाज (व्हीजिंग), छातीत जडपणा आणि सतत खोकला अशी लक्षणे तीव्र होतात. स्थितीची गंभीरता अधोरेखित करताना वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मिरा रोड येथील कन्सल्टंट पल्मोनोलॉजिस्ट डॉ. संगिता चेकर म्हणाल्या की, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि मुंबई सारख्या शहरी भागांमध्ये प्रदूषण आणि जीवनशैलीतील बदलांमुळे दम्याचे प्रमाण वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे अनेक रुग्ण सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करतात आणि वेळेवर उपचार घेत नाहीत. दमा पूर्णपणे बरा होत नाही, परंतु योग्य उपचार, नियमित तपासणीने तो प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येतो. जनजागृती आणि वेळेवर हस्तक्षेप अत्यंत महत्त्वाचे असल्याचे चेकर यांनी सांगितले.